शेलारमामांचे मोक्ष गुरू परमहंस श्री कपिल महाराज!

फेसबुकमुळे जुने अध्यात्मिक स्नेही कृष्णा शेलार म्हणजे शेलार मामांची भेट अठ्ठावीस वर्षांनी झाली. ९४-९५ मध्ये आमच्या ज्या अल्पकाळ भेटी झाल्या त्यावेळी मला श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयांनी नुकतेच बोट धरून त्यांच्या कडे ओढले होते. पण त्यावेळी मामा त्यांच्या अध्यात्मिक प्रवासात खूप पुढे सरकलेले होते. किती व कशाच्या जोरावर याची मला कल्पना नव्हती किंबहुना तो आयाम त्यावेळी मला नव्हता. आता मागील महिन्यात मामांचा नंबर मिळाला व भरपूर, मनसोक्त बोलणं सुरु झालं. बोलण्याच्या ओघात मामांनी त्यांना भेटलेल्या गुरू, सतगुरू व मोक्ष गुरू बद्दल काही कल्पना दिली. मामांचे गुरू हे गडहिंग्लज जवळील सामानगडावरील श्री यशवंत महाराज गावडे भोसले. तर सतगुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. आणि मोक्ष गुरू श्री कपिल महाराज! मामांच्या बोलण्यात फोनवर कपिल महाराजांबद्दल जे समजले त्यावरून लगेच त्यावर लिहावे अशी उर्मी आल्याने मी मामांना तसा मेसेज केला की लिहू का! त्यावर मामांचा फोन आला की थांबा, आपली प्रत्यक्ष भेट होऊदे, कपिल महाराजांबद्दल सविस्तर सांगतो मग लिहा.

पंधरा दिवसांत भेटीचा योग आला व तोही सलग पाच दिवस आणि लोकसंपर्कापासून दूर सामानगडावर, ओंकार पठारावर सलग पाच दिवस, चोवीस तास मामांचा सहवास लाभला. त्यात सुर्योदयाच्या अर्धा तास आधीपासून ते थेट रात्री उशिरापर्यंत मामा अव्याहतपणे अध्यात्मिक धुंदीत बोलत राहिले. सकाळी पटकन पोह्यांचा नाष्टा, दुपारी व रात्री वरणभात करणे व मधल्या वेळेत ओंकार पठारावरील प्रभू श्रीरामचंद्रांच्या पाऊलखुणा एक एक करून दाखवत ज्ञानाची, अनुभूतीची व त्यानुसार आलेल्या अनुभवांची ज्ञानगंगा मामांमधून प्रसवत होती. विषयांची यादी होतीच. त्यातील एक विषय म्हणजे मोक्ष गुरू परमहंस श्री कपिल महाराज! कपिल महाराजांचं पूर्ण नाव आलम पूर्णसुधाकर रेड्डी व गाव आंध्रप्रदेशातील गुंटूर. जन्मसाल १९४६. पाच भावंडांमधील ते शेंडेफळ. हिब्रू भाषेसह जगातील चौदा भाषेंचे जाणकार. उच्च शिक्षणासह आंध्रप्रदेशातील पाटबंधारे खात्यात नोकरी लागली. पण मन रमेना म्हणून ती नोकरी सोडली. यु पी एस सी तून भारतीय वन सेवेत (आय एफ् एस्) मध्ये सिलेक्शन झाले. परंतू पहिलं पोस्टींग आसाम बॉर्डरवर झाल्याने घरच्यांनी सोडले नाही. त्यादरम्यान बायबल, कुराणासह सर्व धर्मग्रंथांचं सार कोळून पिताना रामकृष्ण परमहंसांचा अभ्यास करताना कपिल महाराजांना परमहंस अवस्था प्राप्त झाली. सिलेक्शन, नोकरी, पोस्टींग सगळं बाजूला राहिले व घरातील लोकांना वाटले की याला वेड लागले. मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्यात आले. कपिल महाराजांनी डॉक्टरांना सांगितले की मी वेडा नाही अथवा मानसिक रुग्ण देखील नाही. माझ्या कडे येणारा प्रत्येक रुग्ण तो वेडा नाही असेच सांगतो असे म्हणून डॉक्टरांनी कपिल महाराजांच्या मेंदूला इलेक्ट्रीकल शॉक्स द्यायला सुरुवात केली. महाराज डॉक्टरांना म्हणाले की मी नाही तर तूच वेडा आहेस. घरचेही कोणी महाराजांना समजून घेईनात. तेंव्हा रात्री महाराजांनी मेंटल हॉस्पिटलच्या खिडकीतून बाहेर उडी मारली व घरादाराचा व गुंटूरचा कायमस्वरूपी त्याग करत तडक महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरू केली. महाराजांनी घर सोडले त्यावेळी त्यांच्या घरावर लागोपाठ संकटं आली व २५ एकर जमीनीपैकी थोडी थोडी करत २३ एकर शेती विकली गेली व खाण्यापिण्याचेही वांधे झाले. महाराजांना वेडा म्हणून घोषित करणारा डॉक्टर देखील एका महिन्यात वेडा झाला.

महाराज मजल दर मजल करत १९७७ साली कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज येथे पोहोचले व येथील महादेव मंदिरात दिपमाळेच्या ओट्यावर स्वामी समर्थ एक हाताचा आधार डोक्याला देत तशा मुद्रेत सदोदित येऊन थांबले. त्यावेळी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेल्या कपिल देवचा बोलबाला होता व तरुण अवस्थेतील उंचेपूरे सावळे कपिल देव सारखे दिसत. म्हणून गडहिंग्लज मधील लोक महाराजांना कपिल म्हणायला लागले. महाराज निवडक दहा घरातून एखाद्या घरी करतल भिक्षा मागत अन्यथा एका भज्यांच्या हातगाडी जवळ फेकून दिलेल्या उच्छीष्टावर भूक भागवत. या दरम्यान शेलारमामा अहमदनगर जिल्ह्यात सरकारी नोकरीत होते. परंतु अधनंमधनं गावी गडहिंग्लज येथे जाणं होई. १९८७ साली मामा गडहिंग्लज येथे आले असताना पहाटेच्या अंधारात टिमकी (छोटा डमरू) वाजवित गाव जागवणाऱ्या कुडमुड्या ज्योतिषाचा आवाज दुर वरून ऐकू येत होता. मामांनी मनोमन भावना केली की तो टिमकीचा आवाज माझ्या दिशेने येत आहे. आणि खरोखरच काही वेळात तो आवाज जवळ येत येत मामांच्या दारात आला. मामांनी दार उघडले व दहा रुपये दक्षिणा देत त्या ज्योतिषाच्या पायावर श्रद्धेने डोकं टेकवले. त्याक्षणी ज्योतिष म्हणाला की दोन दिवसांत तुमचा गुरू तुम्हाला भेटणार आहे. मामा सकाळी महादेवाच्या दर्शनाला मंदिरात गेले तर दिपमाळेच्या कट्ट्यावर महाराजांचे दर्शन व नजरानजर झाली.

हेच आपले गुरू अशी कपिल महाराजांना पाहताच मामांची मनोमन खात्री झाली. महाराजांनी घरी घेऊन जाण्यासाठी मामांनी भाड्याची जीप गाडीची सोय केली. महाराजांची अवस्था पाहून जीप वाल्याने महाराजांना गाडीत घ्यायला नकार दिला, गाडीचे सीट खराब होतील म्हणून. मामा म्हणाले की मी तुझे सीट कव्हर बदलून देतो. असं करत मामांनी महाराजांना घरी नेले. लगेच दोन जोड कपडे आणले. पण रजा संपल्याने नगरला परतायचं होतं. महाराजांच्या खाण्यापिण्याची सोय करुन मामा नगरला परतले खरे पण जीवाची घालमेल सुरू झाली. आपल्या मागे महाराजांची सेवा व्यवस्थित होईल का ही चिंता लागली. मग मामांनी महाराजांना नगरलाच आणले व तेथून जिथे जिथे बदली झाली तिथे तिथे महाराजांना घरातील वरिष्ठ सदस्यासारखं बरोबर ठेवलं. घरात मंडळींना मामांनी कल्पना दिली की हे आता कायम आपल्या सोबत राहणार आहेत. महाराज कायम समाधी अवस्थेत व मौन धारण करून असल्याने अगदी लहान बाळासारखं शी शू सर्व जागेवर असे. अवधूताची सेवा सोपी नसते.
परंतु घरातील सर्वांनी महाराजांना मनापासून स्विकारले होते. मामांनी घरात सांगून ठेवले होते की आता माझं आयुष्य महाराजांसोबत बांधलं आहे. त्यामुळे कुणाची हरकत असल्यास माझा निम्मा पगार मी लगेच देईल पण गुरुला सोडणार नाही.

महाराजांचे इंग्लिश लिखाण उत्कृष्ट होते. विचारणा केली तेव्हा त्यांनी त्यांच्या गावचा पत्ता लिहून दिला. मामांनी त्यांच्या घरी पत्र पाठवून महाराज माझ्याकडे सुखरूप आहेत असे कळवून एकदा येऊन पाहण्यासाठी वाटखर्चही पाठवला. महाराजांचा मोठा भाऊ आला.
त्यांनाही कुणाला अशा अवस्थेतील महाराज स्वतःकडे नकोच होते याची कल्पना मामांना होती. तरीही मामांनी भावाला सांगितले की महाराजांना विचारा की तुम्ही येथे खुश आहेत का? त्यावर महाराजांनी तेलगूत भावाला लिहून दिले की “त्याने (मामांनी) मला व मी त्याला ओळखले आहे, आता मला कुठेही जायचे नाही.”

लोकांच्या मागण्यांचा महाराजांना उपद्रव होऊ नये म्हणून मामांनी पहिल्या पासून महाराजांबद्दल शक्यतो कुणालाही स्वतःहून सांगितले नाही. कारण ते सदोदित त्यांच्या आनंदात मग्न असत. २०१६ साली मामा शासकीय सेवेतून निवृत्त झाले व गडहिंग्लज येथे घरी वास्तव्यास आले. २०१८ मध्ये महाराजांनी अचानक खाणेपिणे कमी कमी करत नेले व अश्विनात अन्नपाणी पूर्ण व्यर्ज केले. कोजागिरी पौर्णिमेला महाराजांचा संकल्प मामांच्या लक्षात आला. मामा व त्यांच्या पत्नी आळीपाळीने महाराजांजवळ बसून होत्या. रात्री बारा वाजता महाराजांनी दोघांच्याही पायांवर हात ठेवून नमस्कार केला व आयुष्यभर केलेल्या सेवेची कृतज्ञता व्यक्त केली व सुखासन घालून खेचरी मुद्रा लावली. अवकाशाकडे एकटक नजर लावून महाराजांनी देह सोडला!

जगाला अवधूताची दृश्य कृपा समजावी म्हणून की काय मामांची मोठी कन्या आज कोल्हापुरात विद्यापीठात प्राध्यापक आहे. आम्ही गेलो त्यावेळी तिला कोलंबोत कॉन्फरन्स साठी जाण्याची लगबग होती.दुसरी कन्या डॉक्टर होऊन आज पुण्यात एम् डी करत आहे. एकाच वेळी चार फॅकल्टी मध्ये तिचं सिलेक्शन झाले होते. तिलाच प्रश्न पडला की काय निवडावे. मुलगा कंपुटर इंजिनिअर असून पुण्यात नामांकित कंपनीत आहे. जावई, सुन, नातवंडांनी मामांचा वटवृक्ष अवधूत कृपेने बहरला आहे. मामांच्या कार्यात सर्व अगदी तनमनधनाने समर्पित आहेत. महाशिवरात्रीच्या कार्यक्रमासाठी मुलगा, सुन, मुली, जावई व सर्व नातवंडे गडावर मुक्कामास होती.

सतगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज, पिठापूर यांचा फोटो पाहून मामांच्या घरातील सर्वच म्हणतात की गोपाल बाबा महाराज व कपिल महाराज भाऊ भाऊ आहेत की काय! इतकं साम्य दिसण्यात, शरीरयष्टीत, अवस्थेत, लीलेत, आणि खाणपानात व आवडीनिवडीत.


-हिराचंद गोपालचंद कोठारे

श्रध्येय डॉ शुक्ल ,भाषण – दि 7 मे 2019- महालिंगेश्वर स्थान हे विश्वातील दैवी ऊर्जेचा महास्रोत असल्याचे प्रतिपादन

दि 7 मे अक्षय तृतीयेच्या अक्षय ऊर्जा यंत्रांच्या स्थापनेच्या वेळी श्रध्येय डॉ शुक्ल यांनी सामानगड श्री महालिंगेश्वर स्थान हे विश्वातील दैवी ऊर्जेचा महास्रोत असल्याचे प्रतिपादन केले होते.

श्री शुक्ल काकांचे त्यावेळचे भाषण (ऑडिओ क्लिप) खास आपल्यासाठी येथे देत आहे, अवश्य ऐकावे.

अक्षय ऊर्जा यंत्राची (शिवलिंग चौसष्टी) प्राणप्रतिष्ठापना – 7 May 2019

महाशिवरात्री चा परमपवित्र दिवस, सोमवार दि. 4 मार्च 2019, पुण्याहून सकाळी 7 वाजता श्री ढेकणे परिवारासह सामानगड येथे जाण्यासाठी निघालो. दुपारी  संकेश्वर येथून गडहिंग्लज कडे आमची गाडी वळाली, थोड्याच वेळात आम्ही गडहिंग्लजच्या परिसरात पोहचलो आणि परम सद्गुरू महावतार श्री बाबाजींच्या कृपेने अचानक मनात विचार आला ….. चौसष्ठ ज्योतिर्लिंग… बुद्धीबळाची चौसष्ठ घरे!

बुद्धिबळाच्या चौसष्ठ घरांचे एक अदभुत वैशिष्ट्य आहे. प्रत्येक घरातील संख्या जर दुप्पट गतीने वाढली तर चौसष्ठव्या घरातील संख्या अगणित (Infinity) होते, उदा. पहिल्या घरात 1, दुसऱ्या घरात 2, तिसऱ्या घरात 4 चौथ्या घरात 8 पाचव्या घरात 16 अशी संख्या वाढत गेली तर शेवटच्या चौसष्ठव्या घरात ती संख्या अगणित होते.

चौसष्ठ चे महत्त्व

प्राचीन भारतीय वैदिक सनातन हिंदू धर्म जीवन पद्धती ही पुर्णपणे वैज्ञानिक जीवन पध्दती होती. हे वैज्ञानिक सत्य आजही पाश्चात्य जीवन पद्धतीचे अनुकरण आणि आक्रमण झाले असताना ही  अनुभवास येते.

या प्राचीन जीवन पद्धतीत चौसष्ठ ला खुपच धार्मिक, सामाजिक, तार्किक आणि वैज्ञानिक महत्व आहे. आपल्याकडे चौसष्ठ सिद्ध, चौसष्ठ योगिनी, चौसष्ठ कला चौसष्ठ ऋग्वेदातील ऋचा, चौसष्ठ ज्योतिर्लिंग आणि बुद्धिबळाच्या चौसष्ठ घरांचा विचार येतो अर्थातच ज्यामध्ये अनंतता (Infinity) आहे किंवा निर्माण होते त्याच्या मुळाशी
चौसष्ठ आणि त्याचे वर्गमुळ आठ आहे आता हे आठ म्हणजे काय तर पाच महाभूते (पंचमहाभूते – पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश) अधिक बुद्धीतत्व अधिक मनतत्व आणि अहं (अहंकार) अशी आठ तत्वे मिळून शेवटी नववे महातत्व सोहम (ओंकार) निर्माण होते.

गेली 2 हजार वर्षे जरी आपल्याला 12 ज्योतिर्लिंग माहिती असली तरी प्राचीन भारतात (आर्यावर्त) 64 ज्योतिर्लिंग अस्तित्वात होती, ही ज्योतिर्लिंग केवळ एक शिव उपासना स्थान होती असे नसुन ही सर्व चौसष्ठ ज्योतिर्लिंग   विश्वकल्याणासाठी एक वैश्विक ऊर्जा निर्मिती आणि प्रसारीत करणारी ऊर्जाकेंद्र (Cosmic Power Generating and Transmitting Centers) होती.

या चौसष्ठ ज्योतिर्लिंग स्थाना मधून नित्य पूजाअर्चा, उपासना, साधना, ध्यान, यज्ञ, प्रार्थना, प्रयोग, संशोधन आदी विविध मार्गाने विश्वकल्याणासाठी अनुष्ठान चालत असे आणि त्या दिव्य ऊर्जाशक्तीचा परिणाम म्हणून तेव्हा भारत अजेय आणि समृध्द होता आणि संपूर्ण जग ज्ञान व समृद्धी प्राप्तीसाठी फक्त भारताकडेच येत होते.

काळाच्या ओघात हळूहळू या ज्योतिर्लिंग स्थानांचे महत्व क्षिण होत गेले आणि त्यातील सध्याची 12 ज्योतिर्लिंग स्थाने वगळता अन्य 52 ज्योतिर्लिंग स्थाने लुप्त झाली किंवा त्यांचे धार्मिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक महत्व कमी होत गेले (कालाय तस्मय नम:) किंवा त्यापैकी काही स्थाने परधर्मीय आक्रमकांनी ताब्यात घेऊन त्याठिकाणी त्यांची धर्मस्थळं किंवा प्रार्थना स्थाने निर्माण केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील सामानगड किल्ला आणि त्याच्या भोवतालचे संपुर्ण पठार हा निसर्ग निर्मित ओंकार आकार असलेले पठार आहे, Google वर शोधले असता ते आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. इसवीसनाच्या बाराव्या शतकात सन 1195 मध्ये दुसरा राजा भोज याने येथे किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दक्षिण दिग्विजय मोहिमे दरम्यान त्यांचे या किल्ल्यावर वास्तव्य होते, तसेच समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट या गडावर झाल्याचे येथील जुने जाणते लोक आणि गडकऱ्यांचे वंशज सांगतात.
प्रत्यक्ष गडावर भवानी माता मंदिर, सात कमानी विहिर, अंधार कोठडी या वास्तू अद्यापही सुस्थितीत आहेत.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या बद्दल च्या आख्यायिका येथील रहिवासी आत्मीयतेने सांगतात.

स्वातंत्र्य लढ्यातील आझाद हिंद फौजेचे एक सैनिक आणि आध्यात्मिक सत्पुरुष कै. यशवंतराव महाराज यांचे वास्तव्य या गडावर होते, ते आपल्या भक्त मंडळींना हे पठार निसर्ग निर्मित ओंकार असल्याचे सांगत असत. 1998 साली श्री. कृष्णा तुकाराम शेलार (के.टी. शेलार, सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनिअर) यांनी त्या ओंकार आकाराच्या पठाराचा प्रत्यक्ष शोध घेतला आणि त्याचबरोबर त्या ओंकार पठाराच्या बाजुने असलेल्या गुहा, प्राचीन खुणेची ठिकाणे, प्राचीन ध्यानधारणा स्थाने यांचाही शोध लावला, हे शोध घेत असतानाच श्री. शेलारानी भूगर्भात तयार केलेल्या शिवमंदिराचा (रामाचा वाडा) शोध घेतला. कै. यशवंत महाराज आणि त्यांचे पश्चात त्यांचे शिष्य श्री. कृष्णा तुकाराम शेलार (के.टी. शेलार, सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनिअर) गेली 50 वर्षापेक्षा अधिक काळापासून या पठारावरील भूमिगत शिवमंदिर आणि आजूबाजूच्या परिसराची सुधारणा आणि विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
हे सर्व कार्य करत असताना श्री. कृष्णा तुकाराम शेलार (के.टी. शेलार, सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनिअर) याना अनेक संकटे, मानहानी, उपेक्षा सहन करावी लागली, एवढेच काय समाजाने त्यांना वेडे ही ठरवले, हे ही खरेच आहे की कोणीतरी एखाद्या गोष्टीचे वेड लाऊन घेतल्या शिवाय ती गोष्ट सिद्ध आणि साध्य होत नाही.
या संदर्भातील माहिती www. omkarpathar. com
आणि
www. samangad. com
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या ओंकार पठारावर पूर्वजांनी निर्मिलेल्या अनेक खुणा आजही दिसतात. सिद्ध समाधी योग परिवाराचे संस्थापक कै. ऋषि प्रभाकर यांच्या सारखे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील मान्यवर योग व ध्यान साधनेसाठी येत असत. आजही अनेक साधक योग येथे येऊन निसर्गाच्या सानिध्यात राहुन ध्यान साधना करतात आणि आत्मिक प्रगती साधतात.

महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात सामान गड येथेही वैश्विक ऊर्जेची निर्मिती आणि प्रक्षेपण करणारे एक शिवज्योतिर्लिंग आहे, ज्याचा भौतीक विकास गेली 50 वर्षे प्रथम स्वर्गीय यशवंत महाराज यांनी आणि त्यांच्या नंतर सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनियर श्री कृष्णा तुकाराम शेलार (श्री. के. टी. शेलार) करत आहेत. सदर स्थान श्री महालिंगेश्वर शिवमंदिर म्हणून ओळखले जाते.

चार मार्चला महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी या पवित्र शिवज्योतिर्लिंग दर्शनाला जात असताना परमगुरू महावतार श्री बाबाजींच्या कृपेने अचानक मनात विचार आला ….. चौसष्ठ ज्योतिर्लिंग… बुद्धीबळाची चौसष्ठ घरे! आणि मग विचार चक्र वेगाने फिरू लागली आणि ध्यानाच्या सखोल अवस्थेत सर्व उलगडा झाला …. नियतीला आता लुप्त झालेल्या बावन्न आणि प्रकट असलेल्या बारा अश्या चौसष्ठ ज्योतिर्लिंगांच्या दिव्य ऊर्जा स्थानांची पुन्हा एकदा विश्वकल्याणसाठी आवश्यकता निर्माण झाली आहे, त्यासाठी सर्व चौसष्ठ ज्योतिर्लिंग प्रतीक रुपात एकाच ठिकाणी एकाच पाषाणशिळेत निर्माण करून त्यापासून अगणित दिव्य वैश्विक ऊर्जा आकर्षित करून तिचे अनंतात (Infinity) रूपांतर करून ती दिव्य ईश्वरीय वैश्विक ऊर्जा ( Infinite Divine Cosmic Energy) या विश्वात (Universe) प्रक्षेपित करून सर्व चराचराचे विश्वकल्याण साध्य करायचे आहे.

आपल्या पूर्वजांना परमाणू पासून परमात्म्या पर्यंत सर्वच ज्ञात होते, म्हणूनच गौतम, कणाद, कपिल, अत्री, अगस्ति, विश्वामित्र, वशिष्ठ अश्या सर्वच सिद्ध आणि ऋषिंनी कायमच विश्वकल्याणसाठी वेगवेगळे प्रयोग केले आणि त्यातुन मिळालेले फळ परत निसर्ग (सृष्टी) आणि समाजालाच अर्पण केले.

अगदी महर्षि कणादापासून (अणुरेणू, परमाणू पासून चिदाणु (अणूचा एक लाखावा भाग) पर्यंतचा शोध महर्षि कणाद यांनी लावला) ते अल्बर्ट आईन्स्टाईन (E=mc2) यांनी अखंड ऊर्जेचा सिद्धांत मांडला आहे.

या विश्वात सर्व काही ऊर्जेच्या (Energy) चैतन्य स्वरूपात सतत अस्तित्वात आहे, बदलते ते फक्त त्या ऊर्जेचे स्वरूप! जेव्हा ही ऊर्जा निर्गुण निराकार असते तेव्हा ती आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही, परंतु तिचे अस्तित्व मात्र जाणवते (उदा. विजेचा शॉक बसल्यावर तिचे अस्तित्व समजते), परंतु तिच ऊर्जा जेव्हा साकार (Matter) मध्ये परिवर्तित होते तेव्हा दृश्यमान होते.

हा शिवज्योतिर्लिंग चौसष्ठी चा विचारही या विश्वब्रह्मांडात ऊर्जा रूपाने अखंड अस्तित्वात होता आणि आहे, फक्त परम सदगुरु महावतार श्री बाबाजींच्या संकल्प आणि कृपेने तो माझ्या मनात आणि देहात विचार रुपात प्रकट झाला आणि आता तो प्रकल्प स्वरूपात प्रत्यक्ष अस्तित्वात येत आहे. (Energy converts into Matter and Matter converts into Energy).

त्यासाठी शास्त्रीय पद्धतीने धार्मिक आधारानुसार चौसष्ठ पंचसूत्री शिवलिंग एकाच शिळेवर कोरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याची विधिवत स्थापना करण्यात येणार आहे ज्यामुळे सर्व चौसष्ठ ज्योतिर्लिंगांच्या स्थानी असलेली दिव्य ईश्वरीय वैश्विक ऊर्जा (Infinite Divine Cosmic Energy) या एकाच ठिकाणी एकत्रित (concentrate) होऊन तेथुन ती अनेकपटीने  वृद्धिंगत होऊन विश्वकल्याणसाठी पुन्हा अंतरिक्षात (Cosmos) आणि विश्वात (Universe) प्रक्षेपित (Transmition) होईल.

हा सर्व त्या ओंकार स्वरूप दिव्य परमात्म्याचा संकल्प आहे जो पूर्ण करण्यासाठी त्याने परमगुरू महावतार श्री बाबाजी यांचे दिव्य मार्गदर्शनानुसार कार्य आरंभिले आहे आणि आम्ही सर्व त्यांच्या आज्ञेचे पालन करत आहोत.

||ओम परम सद्गुरु महावतार श्री बाबाजी चरणार्पणम अस्तु ||

बापू पाडळकर